Monday 29 July 2013

Calligraphy-29.7.2013



ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची " पागोळीसारखी " ही कविता . ह्या कवितेच्या आशयासंदर्भातील प्रा माधवी भट ह्यांचा लेख. 
करुणाष्टक मला कायम आवडत आलेय.त्यातल्या सर्वच भावांसकट .एकतर त्या अष्टकाला नैसर्गिक कातरपणाची आगळीच पार्श्वभूमी लाभते.त्यातून ते म्हणताना त्यातले धीर गंभीर भाव...भरूनच येतं मला...बाहेर पाऊस पडत असावा मुसळ्धार ...त्या पावसात आपलं कोणी नाहिये ना सापडलेलं याची खात्री करूनही होत नसावी...अंधारून यावे..संध्याकाळीच गडद रात्रीचे भास ..रात किड्यांची कीरकीर,आणि अश्यावेळी अगदीच काय काय आठवून मन भरून यावं.आप्तांचा वियोग.अवेळीचे मृत्यू..अपेक्षाभंग..साध्या बारक्या इच्छांवर पडलेले आपल्याच माणासांचे निर्दयी पाय आणि त्या इच्छांचे गेलेले प्राण...सर्वच! अस्फ़ुट हुंदका घशात दाटतो..डोळ्यांपुढचं सारं धूसर होतं..पोरकेपणाने खिडकीशी उभे राहतो आपण..बोच-या गारव्यात मायेने जवळ घ्यायला आजीची उबदार कुशी नसते की गरम वाफ़ेभरला भात खाऊ घालणारी जिवाभावाची सखी नसते..अशा घाबरून गेलेल्या वातावरणात शांतपणे सात्विक चेह-याने नंदादीप उजळणारी आणि विझू पाहणारी वात हलकेच वर सारून आशा तेवत ठेवणारी आईपण नसते..दिवा लावल्यावर त्या ज्योतीचा उजेड आधी आएच्या दोन्ही डोळ्यात प्रकाशतो तेव्हा आई जास्तच आश्वासक वाटते ,तिचा चेहरा वारंवार डोळ्यापुढे येतो आणि कानात करुणाष्ट्क घुमू लागते- अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीनदयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता खिडकिच्या बंद काचेवर बाहेरून अविरत कोसळणारा पाऊस दिसत रहावा तसाच मनावर करुणाष्टकाचा पाऊस झरतो आणि जोडीला डोळे झरत जातात...! करुणाष्टक अधिक आर्त करीत जाते वातावरण..तश्याच काही कविताही असतातच...! ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता वाचून तर कित्त्येकदा ती हुरहुर रात्रभरही पुरत जाते...व्यापून उरते....! पण या कासावीस होण्याची खरी सुरुवात होते ती या करुणाष्टकानेच....! परवा अरुणा ढेरेंची "पागोळीसारखी " ही कविता वाचनात आली...कविता वाचून अस्वस्थता वाटायची ती वाटलीच....!मनस्वी मनाच्या माथ्यावर सटवाईने एकाकीपणाचा लेख अधिक गडद अक्षरात लिहिलेला असतो बहुदा.....कारण अनेक लोकातही ती एकटी मने स्पष्ट दिसतात ,....जाणवतात...! उदासीनता घेरून घेते...आणि मग आपलं कुणीच नाही ही जाणिव गहीरी होत जाणे....हे अपरिहार्यच...! मनाच्या गूढ काळ्या डोहात अधिकाधिक डूंबत जायचे...याला पर्याय नाही..! बालकवींच्या निसर्गकवितेचा विचार केला तरी लक्षात येइल की त्यांनी पारवा..घुमट या कविता मनाच्या ज्या अवस्थेत लिहिल्या ती अवस्था फ़ार एकलेपणाचीच होती...! आपल्या उदासीनता नावाच्या कवितेत बालकवी लिहितात ते मोठे मार्मिक आहे....ते म्हणतात ही उदासीनता नक्की कुठून कशी येते? मनाला नक्की काय बोचतं?ते सुद्धा कळत नाही..मग अश्यावेळी मनावर इलाज तरी कोणता करावा? कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवायाला ? कुणीकडे हा झुकतो वारा हाका मारी जीव कुणाला? मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती,परि ती दिव्य औषधी कसली त्याला? ही अवस्था अनेकांची अनेकदा होते..! काय झालंय असे कोणी विचारले तरी त्यावर उत्तर देता येऊ नये...हे मोठे वाईट असते....! विशेषत: तेव्हा जेव्हा सर्वच बोलून दाखवायचा काळ असतो... त्यावेळी आपल्या मनातली वादळे न सांगता कुणाला कळतील ही अपेक्षा करणेही चुकीचेच आहे ना? खूप मळभ दाटून यावे मनात.....घडल्या न घडल्या घटनांचे कढ ....आणि खिन्न होत जावे.....मनातल्या मनात खूप झरावेत अषाढ मेघ..आणि त्या अश्रुतून ..तुडूंब कातर उदासी मात्र पागोळीसारखी झरत रहावी...! नेमकी ही संध्याकाळची कातरवेळा असावी..आणि आधिच्याच गडद वातावरणात काळवंडून जावे मन...! चारी बाजुंनी प्रतिकुलता वेढू लागली की त्यात हरवत जाते सारेच...! आपले प्रेयस श्रेयस सर्वच...! अरुणा ढेरेंच्या करुणाष्तकातही ही खंत भरून आहे ...त्या एका कडव्यात लिहितात... गडद गडद झाले सावळे मेघ काळे लूकलूक हृदयाची चांदणी त्यात हाले सगूण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे अवघड मन त्याचे दु:ख कोणास ठावे? अश्यावेळी कुणीच नसतं आपलं .....शिवाय असे दुर्मुखलेले चेहरे कुणालाही नको वाटतात...आपलं मन आपल्यालाच सांभाळावं लागतं...! काळाने क्रूरपणे हिरावून घेतलेले आपले जीवलग आपल्याला स्मरतात....! ते कधीही परतणारे नसतातच...! भिजता पापणी पूस म्हणणारे जवळ आपुले कोणी नाही.......! मी डोळे मिटून घेते....उष्ण थेंब ओघळतो गालावर....तिथेच वाळून जातो ....!लहान बाळाने हट्ट धरून अखेरीस रडता रडताच निजून जावं तसं हळूहळू निवत जातं मन...आणि स्पंजसारखं जड होत जातं...तो भार सोसत नाहीच जिवाला...! अरुणा बाईंची कविता व्यापून उरते..आपल्याच मनातलं हे असं उघड उघड सांगितलय बाईंनी असे वाटून ओशाळं होतं...आणि क्रुतद्नय ही वाटू लागतं.....! मनात ओळी उमलू लागतात... नाहीच कुणी आपुले रे प्राणांवर नभ धरणारे दि:काल धुक्याच्या समयी हृदयाला स्पंदविणारे......

No comments:

Post a Comment