Sunday 2 February 2014

Calligraphy-02.02.2014

ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांच्या निरंजन ह्या काव्यसंग्रहातील 'किती अनावर ' ही कविता …ह्या कविते संदर्भात नुकतेच वाचनात आलेले प्रा. माधवी भट ह्यांचे 'न लिहिलेली पत्रे ' ह्या फेसबुक Creative Writers page वरील पत्र 

प्रिय मिता....
आज अरुणा ढेरे वाचत होते...खूप रंगून गेले..इतके की रोजची कामेही आठवेनात.. आज काय करावं ते सूचत नव्हतं..मग अभ्यासाचं टेबल आवरायला घेतलं तर खूप कागदांच्या खालीअरुणाताईंचं पुस्तक दिसलं..."निरंजन" मग काय , वाचत सुटले...काही कवितांपाशी रेंगाळत बसले...रमले....आणि काही कवितांपाशी बसून मान झुकवून रडूनही घेतलं....! आता शांत वाटतंय...!
मात्र तुला न सांगता पुस्तक कसं मिटायचं? म्हणून पत्र लिहायला घेतलं..!
कवितेचं नाव आहे "किती अनावर "
अंधार डहाळी झुलते हृदयापाशी
एकेक कळी श्वासांनी उमलत जाते
विखुरतो कोवळा मरणगंध हलक्याने
माधवी रात्र स्मरणाशी निथळत येते....

तू दूर नदीच्या काठाशी एकाकी
मी केशरज्योती पाण्यावर पाठवते
आतल्या धगीने उजळत नवखे काही
रे जसे वाहत्या शब्दांवर थरथरते

तू आसक्तीची गुणगुणताना ओळ
हे किती अनावर दु:खाचे खळखळ्णे
होकार नकारापल्याड बघ ना आता
आपुल्या चांदणी नात्याचे सळसळणे...!
- अरुणा ढेरे(निरंजन)

मी कवितेचा विचार करू लागले तेव्हा कळलं की या बाईन्नी किती खोल लिहिलय हे? अंधार डहाळी तिही हृदयाशी झुलणारी.......त्या अंधा-या डहाळीला लागलेली कळी तरी कशाची असेल? जिचा मरणगंध विखरतो ती कळी? बापरे...! ही मनाची नक्की कोणती अवस्था आहे?त्या मनात नकारांचे, विरोधांचे,निशेधाचे किती पापुद्रे आहेत..ज्यातून बीज रुजलंय त्याची डहाळीच अंधारी आहे.....म्हणजे ही जाणिवच फ़ोफ़ावतेय का? पण त्यातही अरुणाताईंचा लाडका शब्द तिथे आलाय..."माधवी" ...! शब्दकोशानुसार माधवी या शब्दांचे काही अर्थ होतात...ते म्हणजे - ते एक प्रकारचे फ़ुल आहे.....दुसरा माधवी हे दशावतारातील एक पात्र आहे...तिसरा अर्थ आहे राधा..कारण ती माधवाची प्रिया आहे....चौथा आणि महत्वाचा अर्थ आहे वसंतऋतू ....! या अर्थांतला जर चौथा अर्थ गृहीत धरला तर इतक्या काळोखात..म्हणजे मनाच्या कभिन्न अवस्थेतही माधवी रात्र...तिचे स्मरण होतेय...म्हणजे जगण्यातला वसंत स्मरतोय...! जो कधी पायाशी फ़ुलांची वासंतिक पखरण घालणारा होता...! पण वसंताचं एक असतं ...तो लगेच जातो...परत मग ग्रिष्माच्या झळा येतातच वाट्याला....! हेमंताची गोठवणारी थंडी, आणि शिरीराची आनिवार्य पानझडही....!
तशी ही माधवी रात्रे.....जिचे स्मरण होतेय.....!
या नात्यात एक अपरिहार्य अंतरही आहे...जे कदाचित परिस्थितीचे आहे....तू दूर नदीच्या काठाशी एकाकी....! ही मधली अफ़ाट नदी सामाजिक रुढींची संकेतांची आहे का? ज्या ऐलतटावर पैलतटावर दोघे जीव एकाकी आहेत? आणि तरिही जिवाच्या ओढीतून एक लखलख केशरज्योत ..आशेची, उमेदीची...किंवा विश्वासाची पाण्यावरून पाठवावीशी वाटतेय......आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपल्या शुभेच्छा अश्या पोचत असतील का रे मिता? किती खुळा विचार आहे हा? आणि किती निरागस लोभस देखील....! वरवर विझू विझू झालेल्या मनाच्या आत एक निखारा असतोच की रे जिवंत....त्याची धग जाणवत्च असते आपल्याला....! त्याच आतल्या धगीने काहीतरी नवीएन उजळत येतेय मनाशी...हे उजळणे खूप महत्वाचे आहे...लाख मोलाचे आहे.....!
खरं तर कैकदा माणूस नक्की कुठून जुळऊन आहे आणि कुठून तुटलंय हे ही कळत नाही बघ....! काही नात्यांची नावं शेवटपर्यंत ठरत नाहीत....आणि त्यांची दीर्घता आकळत नाही...म्हणायला म्हणतो आपण की कोणीच शेवटपर्यंत पुरत नाही कुणालाच.....मात्र अश्यावेळी त्यातली फ़ोलता लक्षात येते...जर पुरणार नसतं कुणीच तर मग आठवणी का पुरतात अखेरपर्यंत? की आठवणी अमूर्त असतात त्यामुळे त्यांचा अंतर्भाव जगण्यात होत नाही? मिता तू नि मी कोणत्या बळावर आला दिवस साजरा करतोय? केवळ आठवणींच्याच ना? मग आता मी असं म्हनू का की तू तर नाहियेस माझ्या प्रत्यक्ष जगण्यात....पण तरिही तू आहेस ..व्यापून आहेस हे मला जाणवतंच ना? मग मी हे नाहीच म्हणत की कोणी कोणालाच पुरत नाही....इनफ़्याक्ट ...व्यक्ती जे देऊन जातात ते त्या देण्याच्या रुपात आपल्याशी जुळूनच असतात....! म्हणूनच काही जागा, प्रसंग दृश्य यातून आपल्याला नेमकी व्यक्ती स्मरते.....!
आपलं माणूस आपल्याला हवं असणं ...वाटणं...त्याची कामना धरणं हे किती नैसर्गिक आहे...त्या आसक्तीचं काय करायचं असतं? पण त्या आसक्तीची एक हाक पाठवल्यावर तिला प्रतिसाद देता न येण्यासारखं दुसरं दु:ख कोणतं असतं? किती अनावर असतं...!
शेवटच्या दोन ओळीत बाई कहर करतात आणि हे नातंच एका उंचीवर नेऊन ठेवतात जिथे कोणत्याही लौकिकाचा त्याला स्पर्श होणार नाही...कारण आता ते चांदणी नातं झालंय...ते सामान्यांपासून कितीतरी योजने लांब आहे....!त्यात होकार नकाराचा प्रश्न नाही...संकेतांची भीड नाही..कुणाचाही मुलाहिजा नाही....!
मिता, ही कविता मला एका संदिग्ध वळणावर आणून ठेवते...कविता लिहिताना कवी कुठल्या अनुभवाला सामोरे जात होता ते आपण सांगूच शकत नाही...तरीही आपण त्या कवितेचे आपापल्या अनुभवाच्या साधर्म्यातून अर्थ लावत जातो...आणि शोधत जातो आपापली समर्थने...आपापल्या वागण्याची कारणे...किंवा पोळल्या मनावर सांत्वने ही.....!
अरुणाताईंची कविता सांत्वन शोधत नाही...ती आहे ते सरळ स्वीकारून पुढे जाते....आहे त्यातून एक हिरवा लसलशीत कोंभ रुजणारं कायतरी आश्वासक शोधून घेते......!
हे फ़ार फ़ार महत्वाचं आहे...आपण जे अनुभवतो ते नीट सुसंगतपणे आपल्याच पुढ्यात मांडून ठेवायचं मग त्याकडे त्रयस्थासारखं बघत जायचं....त्या सुखद , दुखद अनुभवाला जोजवून मग त्याला अलगद त्रिपुरारी पौर्णिमेला गंगेत दिवा सोडावा तसं जगण्याच्या पसा-यात सोडून द्यायचं....त्या अनुभवाची गाठ मनात बांधून ठेवायची आणि परत पुढल्या क्षणासाठी सज्ज व्हायचं......! किती बळ लागतं यासाठी? मात्र ते बळ ही कविता आपल्याला देत जाते...स्वत:सोबत इतरांनाही समृद्ध करीत जाणं फ़ार कमी जणांना जमतं मिता....फ़ार तर अनुभव हे आपल्यापुरते मर्यादीत ठेवून त्याबरहुकुम आपली जगण्याची शैली निर्माण करून त्यांना तत्वांची नावं देत जगण सोपं आहे.......मात्र आपल्या अनुभवांनी शहाणं होत स्वत:ला सावरून तेच परत पुढे मांडायला धाडस लागतं.....
आणि असे धाडसी लोक अभावानेच आढळतात...! मनाची दिगंबरावस्था प्राप्त व्हावी लागतेच त्यासाठी....!अवघड आहे ते....!
कवितेचा मी लावलेला अर्थ चुकीचा असेल कदाचित...किंवा मी तिच्या फ़ार खोलात जाऊन लिहितही नसेल...मात्र या अधर ओळींवरून परत तिच्या गाभ्यात शिरायला आवडेल मला....अरुणाताईंची कविता बीटवीन द लाईन्स वाचावी अशीच आहे...ती ओळींमधून कळते त्याहून जास्त ती त्यातल्या मधल्या अवकाशातून जास्त कळते..आणि एकेका ओळीचा तर जाऊ देत मात्र एकेका शब्दाचा अवकाश व्यापून उरणारा आहे....हे कविता वाचताना जाणवतच जातं....!
अरुणाताईंच्या करुणाष्टकाबद्दल लिहेन तुला कधीतरी....त्यात बाई लिहितात....
अनुभव नवलाचे सत्य सारून आले...
हळुहळू कळते की काही नाही कळाले.....!
मी अरुणाताईंना म्हणाले; का लिहिता असं? किती विलक्षण जिव घेणं आहे हे? तर त्या येवढंच म्हणाल्या की "माधवी , खरेय ना ते ? " मी काय बोलायचं यावर मिता?
भाग्यवान समजते स्वत:ला की आयुष्याच्या एका वळणावर जिथे मी जगणंच नाकारायला सज्ज होते तिथे मला अरुणाताईंचे शब्द भेटले.....आणि पुन्हा शब्दांचे ऋतू कळू लागले...अंगणात आले.....!
आता ही कविता दिवसभर वाजत रहाणार डोक्यात..आणि त्यातून आणखी काय काय कळत जाणार....तुला कदाचित माझ्याहून वेगळं दिसेल....कवितेचा क्यालिडिओस्कोप असाच असतो...प्रत्येकाला तिच्यातून वेगळी नक्षी दिसते....आपण आपापली नक्षी इतरांना दाखवत जायची नि तिला अधिकाधिक समजून घ्यावे इतकेच.....!
तुला कविता आवडली का? कशी वाटली ते नक्की कळव...! वाट बघते पत्राची...!
तुझी
चंद्रमाधवी

1 comment:

  1. I love the way the poem is interpreted, explained.. really nice and thanks.

    ReplyDelete