Friday 13 July 2012

Calligraphy-13.07.2012






आज १३ जुलै... इतिहासालाही अभिमान वाटणारा दिवस. बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल मावळ्यांच्या अतुलनीय शौर्याचा दिवस


जवळपास चार महिनाच्या पन्हाळगडाच्या करकचून आवळलेल्या सिद्धी जौहरच्या वेढ्यातून , शिवाजी महाराज आणि इतर ६०० मावळे १२ जुलै १६६० च्या पावसाळ्या रात्री निसटले आणि विशाळगडाकडे पायी जाऊ लागले . महाराज निसटून गेल्याचे कळताच चवताळलेल्या सिद्धी मसूद आणि ३००० घोडेस्वारांनी पाठलाग सुरु केला आणि गजापूरच्या खिंडीत गाठले. बाजीप्रभूंनी महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही विशाळगडाकडे जा तोपर्यंत मी ह्या गनिमांना रोखून धरतो
निम्मे मावळे म्हणजे ३०० मावळे महाराजांबरोबर दिले आणि विशालगडाकडे पाठवून दिले आणि मग स्वतः बाजी प्रभू , त्यांचे धाकटे बंधू फुलाजी प्रभू आणि मुठभर मावळ्यानी पराक्रमाची शर्थ केली.
फारतर दीड तासाच्या अंतरावर असलेल्या विशालगडाच्या पायथ्याशी महाराज आणि इतर मावळे पोहचले खरे पण इथेही दुर्दैव आड आले. विशालगडाला सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी ह्या विजापूरच्या दोन सरदारांनी आधीच वेढा घातला होता. पन्हाळ गडाकडून निघाल्यापासून सतत १४ तास पळत आलेल्या महाराजांना आणि त्या मावळ्यांना ह्या सरदारांशी युद्ध करावे लागले. गडावर पोहचण्यासाठी झुंजावे लागले.
आणि अखेर पन्हाळ गडाकडून निघाल्यापासून जवळ जवळ २१ तासांनी महाराज विशालगडावर पोहचले आणि तोफांचे आवाज कडाडले.
तोपर्यंत मुठभर मावळ्यानिशी बाजीप्रभू रक्ताच्या सड्यात झुंझत राहिले.

गजापूरची खिंड पावन झाली.

ह्या ऐतिहासिक प्रसंगावर कुसुमाग्रजांनी लिहिलेली अप्रतिम कविता .. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना लता मंगेशकर ह्यांनी गायिली आहे.

No comments:

Post a Comment